८८ परंपरेचा उत्सव, पिढ्यांना जोडणारा गणेशोत्सव

८८ परंपरेचा उत्सव, पिढ्यांना जोडणारा गणेशोत्सव

कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते हिरव्यागार डोंगररांगा, समुद्राच्या अथांग लाटा, नारळाच्या झावळ्यांनी सजलेली गावं, आंब्याच्या बागा, सुपीक मातीचा सुगंध आणि शतकानुशतकं चालत आलेल्या परंपरा. या निसर्गचित्रात जेव्हा एखादा उत्सव सामील होतो, तेव्हा कोकणाचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं. त्यातही गणेशोत्सव हा कोकणाचा आत्माच जणू. हा उत्सव म्हणजे फक्त धार्मिक सोहळा नाही; तो एक सांस्कृतिक मेळा आहे, कौटुंबिक बंध जपणारा, गावागावच्या लोकांना एकत्र आणणारा, आणि शहरात विस्कटलेल्या नात्यांना पुन्हा घट्ट करणारा एक सोहळा आहे. म्हणूनच अनेकदा म्हटलं जातं, “कोकणातील गणेशोत्सव म्हणजे दिवाळीच!”

गणेशोत्सव जवळ आला की कोकणातील प्रत्येक गावी, वस्तीत, पाड्यात लगबग सुरू होते. पण हा उत्सव खरं तर सुरू होतो शहरातल्या चाकरमान्यांच्या तयारीपासून. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, वसई, नाशिक अशा ठिकाणी कामाला गेलेली माणसं गणपतीच्या आधी गावाकडे परत येण्यासाठी धडपडू लागतात. रेल्वेच्या खिडकीवर प्रचंड गर्दी, बस स्थानकं गजबजलेली, प्रायव्हेट गाड्यांचा ताफा निघालेला. तरीही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू. कारण “गावाकडे जायचंय, बाप्पाला घरी आणायचंय” या भावनेपुढे कष्ट काहीच नाहीत. कोकण रेल्वेच्या डब्यातून गाणं फुटतं, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!” प्रवास थकवणारा असला तरी गावाकडे पोचल्यावर घराच्या दाराशी ओल्या मातीतून सुटणारा सुगंध सगळी थकवा धुऊन टाकतो.

गावात पोचल्यावर घराघरांत वेगळीच लगबग दिसते. अंगण झाडून स्वच्छ केलेलं, मातीचा लेप दिलेला, रांगोळ्यांनी सजवलेलं. घरातील महिलांचे गडबडीतले आवाज, पुरुषांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता, मुलांच्या डोळ्यांतली चमक, हे सगळं मिळून गणेशोत्सवाचं पहिलं रूप उभं राहतं. कोकणात अजूनही अनेक ठिकाणी गणेशमूर्ती घरीच बनवण्याची परंपरा आहे. शेतातील माती आणून साधी, लहान पण भावपूर्ण मूर्ती घडवली जाते. काही घरांत शाडूच्या मातीतली मूर्ती आणली जाते. कारागीर बनवलेली मूर्ती मोठे डोळे, मोहक हसू आणि हातातला मोदक घेऊनच बाप्पाच्या लाडक्या रूपात घराघरांत विराजमान होते. “हो बाई, आज गड्यावर बाप्पा यायचा आसा” असा कोकणी संवाद अंगणात ऐकू आला की वातावरणातच पवित्रता भरते.

गणेश चतुर्थीच्या सकाळी गावात मंगल वाद्यांचा गजर सुरू होतो. ढोल-ताशांचा निनाद, झांजांचा आवाज, शंखनाद, सगळं वातावरण भक्तीमय होतं. गणपती आणताना गावकरी, लहान मुले, महिला सर्वजण “गणपती बाप्पा मोरया” म्हणत गजर करतात. काही जण मूर्ती बाईकवर आणतात, काही बैलगाडीत, तर काही मंडळी मूर्ती डोक्यावर घेऊन गावभर नाचत चालतात. बाप्पा आल्यावर घरात मंगलाष्टकं म्हणत पाळण्यात विराजमान केले जातात. घरभर एक आनंदाची लकेर पसरते.

सकाळ-संध्याकाळ आरती म्हणजे गावाचा प्राण. “सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची…” या आरतीच्या गजराने प्रत्येक अंगण दुमदुमतं. महिलांच्या ओव्या, मुलांचे जयघोष, पुरुषांच्या टाळांचा नाद, हे ऐकताना जणू स्वर्गीय गाणं कानावर येतं. “बाप्पा मोरया रे, मंगल मूर्ती मोरया” चा नाद डोंगरकपाऱ्यांतूनही परत येतो. घराघरांत पूजा, नैवेद्य, आरत्या सुरू असतात.

गणेशोत्सव हा फक्त पूजा-अर्चना नाही, तर एक सांस्कृतिक मेजवानी आहे. गावोगाव रात्री दशावताराचे प्रयोग रंगतात. कृष्ण, नारायण, विष्णू यांची रूपं लोकांसमोर उभी राहतात. तळ कोकणात, काही गावांमध्ये तर पेट्रोलमॅक्स च्या उजेडात चालणारे हे प्रयोग लोकांना मंत्रमुग्ध करतात. काही ठिकाणी भजनी मंडळं गाणी म्हणतात. ढोलकीच्या तालावर “गजानना श्रीगणराया”च्या गजराने रात्री अधिक पवित्र होतात. महिलांच्या ओव्या, मुलांच्या स्पर्धा, तरुणांची नृत्यं, सगळं गाव उत्सवात रंगून जातं.

खेळांची तर काय सांगावी! दिवसभर मुलं- मुली फुगडी, लंगडी, आट्यापाट्या खेळतात. तरुण कबड्डी, खो-खो, हत्तीफोड, दोरीखेच अशा खेळांत रमलेले असतात. उखाणा स्पर्धा रंगतात. “माझा उखाणा सांगेन हळदीकुंकवाच्या दारी, बाप्पा आला घरोघरी, दिला आनंद सारी” – अशा उखाण्यांनी वातावरण रंगून जातं. कोकणी बोलीतले संवाद, गप्पा, टाळ्यांचा कडकडाट यामुळे खेळांचं रूप वेगळंच दिसतं.

गणेशोत्सव म्हणजे खाण्याचाही उत्सव आहे. घराघरांतून गोड सुगंध पसरतो. उकडीचे मोदक हे बाप्पाचे लाडके नैवेद्य. वाफाळलेल्या उकडीच्या पिठातलं गोड सारण म्हणजे स्वर्गीय आनंद. पुरणपोळी, करंज्या, अनरसे, लाडू, घावन, पातोळ्या, गुळ-खोबऱ्याच्या वड्या – हे सारे पदार्थ घराघरांत बनतात. जेवणात नारळाची चव भरपूर. शाकाहारी घरांत वरण-भात, भाज्या, आमटी, पापड, दही. मासे खाणाऱ्या घरांतसुद्धा या दिवसांत शाकाहार पाळला जातो. “खाशील का बाई एक मोदक?” असा कोकणी प्रश्न ऐकला की मन भरून जातं.

या उत्सवाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे सामाजिक एकोपा. कोणाच्या घरी गणपती बसला तर संपूर्ण गाव तिथे आरतीला जातं. गावोगाव मंडळं एकमेकांना भेटतात. तरुण मंडळी रक्तदान शिबिरं, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम अशा उपक्रमांत सामील होतात. लग्नकार्य, दुःखसुख बाजूला ठेवून लोक एकत्र येतात. गावात जत्रेसारखं वातावरण असतं.

दहा दिवस गाव आनंदात न्हातं, पण विसर्जनाच्या दिवशी मात्र डोळ्यांत पाणी येतं. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आवाजात, आरत्यांच्या गजरात बाप्पा नदीत, समुद्रात विसर्जित होतात. समुद्राच्या अथांग लाटांमध्ये मूर्ती विरघळते आणि गाव पुन्हा नव्या उमेदीनं जगायला सज्ज होतं. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” चा गजर विरह आणि भक्तिभाव यांचा संगम घडवतो.

पूर्वीचा साधेपणा वेगळा होता. मातीच्या मूर्ती, साध्या सजावट, आरत्या – यात माधुर्य होतं. आज मोठमोठ्या सजावट, DJ, लाईटिंग, नृत्यस्पर्धा, या नव्या स्वरूपामुळे उत्सवाचं रूप बदललं आहे. पण कोकणात अजूनही परंपरेची शुद्धता टिकून आहे. आज अनेक गावांत पर्यावरणपूरक गणपती बसवले जातात. शाडूच्या मूर्ती, नैसर्गिक रंग, पाण्यात विरघळणारी सजावट, यामुळे पर्यावरणाचं भान राखलं जातं.

गणेशोत्सव हा खरं तर पिढ्यांना जोडणारा उत्सव आहे. आजोबा-आजी जुन्या आठवणी सांगतात, पालक मुलांना परंपरा शिकवतात, तरुण मंडळी आधुनिकतेचं स्पर्श आणतात. जुन्या-नव्याची सांगड या सणात दिसते. म्हणूनच तो केवळ धार्मिक सोहळा नसून सांस्कृतिक पूल आहे.

कोकणातील गणेशोत्सव म्हणजे निसर्ग, श्रद्धा, परंपरा, प्रेम आणि एकोप्याचं सुंदर मिलन. हा उत्सव घराघरातल्या अंगणाला उजळवतो, गावाला चैतन्यमय करतो आणि पिढ्यानपिढ्या जोडतो. बाप्पा आल्यानंतर गाव हसतं, गातं, नाचतं. विसर्जनानंतर गाव पुन्हा जगायला सज्ज होतं. या सणातली भक्तिभावाची, परंपरेची आणि आनंदाची उर्जा म्हणजे कोकणाचं खरं हृदय आहे.

डॉ. प्रा. प्रदीप ढवळ
उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.
कार्याध्यक्ष- कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी.

IPRoyal Pawns